📰 MUMBAI MITRA EXPOSE
——
◆ अंधेरीच्या विरा देसाई रोडवरील ‘डंपिंग ग्राउंड’मुळे रहिवासी त्रस्त
◆ पालिकेच्या के पश्चिम विभागाचे दुर्लक्ष
◆ पन्नासपेक्षा जास्त ट्रक होतात रिकामी
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील एका मोकळ्या भूखंडावर गेल्या दोन-तीन वर्षापासून दररोज 50 पेक्षा जास्त ट्रकमध्ये भरून बांधकामाचा ढिगारा टाकला जात असून या भूखंडाला ‘डंपिंग ग्राउंड’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सदर भूखंडाच्या समोरील इमारतींचे रहिवासी त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळविणार्या या प्रकाराबद्दल मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागाकडे असंख्य तक्रारी करूनही पालिकेकडून काहीच कारवाई होत नसल्याबद्दल या परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता मोहिमेची ऐशी तैशी करणार्या पालिका अधिकार्यांवर कारवाई का करू नये? असा सवाल ही येथील नागरिक विचारत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील विरादेसाई रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील ‘क्रेस्ट मुक्ता’ या इमारतीसमोरील एक भूखंड मोकळा आहे. येथे साधारणतः 2020 सालापासून या भूखंडावर सातत्याने बांधकामाचा ढिगारा (मलबा) टाकला जात आहे. दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत ट्रकद्वारे हा कचरा टाकला जातो. दररोज साधारणतः 50 हून अधिक ट्रकमधून कचरा आणून येते ओतला जात आहे.
सुरुवातीला येथील रहिवाशांना असे वाटले होते की, येथे एखादा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. मात्र हळूहळू त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पालिकेकडे तक्रारी करायला सुरुवात केली. परंतु गेली तीन वर्षे पालिकेच्या के/पश्चिम विभागाकडे येथील नागरिक सातत्याने या डंपिंग विरोधात तक्रारी करत असूनही पालिकेचे अधिकारी याकडे सोयिस्कररित्या, दुर्लक्ष करत आहेत. या डंपिंगचे पुरावे देऊनही पालिका लक्ष का देत नाही? असा येथील नागरिकांचा सवाल आहे.
गेले दोन-तीन वर्षे येथे बांधकामाचा मलबा टाकल्याने या भूखंडाला ‘डंपिंग ग्राउंड’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे डंपिंग केले जात असताना त्यातून धूळ उडून प्रदूषण वाढते. या प्रदूषणामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार उद्भवले आहेत. वाहत्या वार्याबरोबर येथील धूळ-माती रस्त्यावर येऊन पडते. यामुळे येथील रस्त्यावर धुळीचा थर तयार झालेला दिसतो.
येथील स्थानिक नागरिकांच्या मते या भूखंडाच्या आतमध्ये काय चालले आहे, ते नागरिकांना काहीच कळत नाही. आतमध्ये भंगाराने भरलेले ट्रक जाताना दिसतात आणि बाहेर येताना हे ट्रक रिकामे झालेले दिसतात. भूखंडावर एक जेसीबी मशीन आहे, या जेसीबी मशीनद्वारे ट्रकमधील मलबा काढला जातो. बर्याचदा ट्रकमधील माती, सिमेंट, विटांचा चुरा रस्त्यावर पडतो. विशेष म्हणजे विविध बांधकामांच्या साइट्स वरून हा कचरा उचलून आणला जातो आणि या भूखंडावर टाकला जातो.
या धुळीचा त्रास येतील स्थानिक दुकानदारांनाही सहन करावा लागतो. त्यांना वारंवार आपल्या दुकानाची आणि दुकानासमोरील भागाची स्वच्छता करून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे या रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांनाही या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कथित ‘डंपिंग ग्राउंड’मुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या स्वच्छ मुंबईच्या मोहिमेला तडा जात आहे. या ‘डम्पिंग ग्राउंड’कडे दुर्लक्ष करणार्या पालिकेच्या अधिकार्यांवरच का कारवाई करू नये? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.