ठाणे
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर हातचे विरोधी पक्षनेतेपद पण जाईल या भीतीने अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. ताई आणि दादांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनाठायी टीका करण्याची लागलेली स्पर्धा पाहिली की आम्हाला ‘दया कुछ तो गडबड है’ हाच डायलॉग आठवतो असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नाव आहे. राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असे त्यांचेही स्वप्न होते. त्यांच्या राजकीय आयुष्यात एकदा तशी संधी त्यांच्यासाठी चालून आली होती. मात्र शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या असतानाही मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला देऊ केले, त्यामुळे दादांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला तो कायमचा असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे