वाडा
डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचा मोहोर गळून मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून अत्यंत तुटपुंजी हेक्टरी ३५ हजार रुपये देण्यात आली होती. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल विमा कंपनीने व प्रशासनाने घेऊन तात्काळ प्रति हेक्टरी ५६ हजार रुपये विम्याची रक्कम वाढवून ती ९१ हजार रुपये केली आहे.
प्रति हेक्टरी २० हजार ३०० रुपयांचा विमा हप्ता भरूनही नुकसानीनंतर विमा कंपनीने अल्प प्रमाणात (३५ हजार रुपये) नुकसानभरपाई दिली होती. याबाबत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही ओरड करून पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना निवेदन दिले होते. अखेर रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पूर्ण विमा देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमाही केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दिलीप नेरकर यांनी दिली.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे कोकण विभाग प्रतिनिधी आरिफ शेख यांनी याबाबत कोकण विभागातील पालघर जिल्ह्याकरिता आंबा फळपीक विम्यासाठी हेक्टरी ९१ हजार रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ वितरित करण्यात येत असल्याचे शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके व पालघरचे जिल्हा कृषी अधीक्षक दिलीप नेरकर यांच्या समक्ष जाहीर केले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाल्याने या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबा फळपिकासाठी विमा कंपनीने प्रति हेक्टरी २० हजार ३०० रुपयांचा हप्ता केल्याने अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा पीक विमा घेतला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपासून मुकावे लागले. या आपदग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विमा हप्तय़ाची जास्तीची रक्कम व विमा काढण्यासाठी असलेल्या जाचक अटी यामुळे माझ्यासारखे अनेक शेतकरी विमा काढण्यासाठी पुढे आले नाहीत.