ठाणे
दिवसेंदिवस महाराष्ट्रातील बड्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित शहरातील पोलीस प्रशासनावर स्थानिक नागरिकांकडून टिकाही केली जाते. पण शहरातील गुन्हेगारी थांबवायचं पोलिसांनी मनावर घेतलं, तर काय केलं जाऊ शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत एकूण 170 आरोपींना गजाआड केलं आहे. ठाणे पोलीस अचानक अॅक्शन मोडमध्ये आल्यानं परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री 9 वाजता ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले आहे. या कारवाईत ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत शहरातील एकूण 170 आरोपींना आणि संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 152 पोलीस अधिकारी तर 834 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. एकाच वेळी अचानक सुरू झालेल्या ऑपरेशमुळे बेसावध असलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
गुरुवारी रात्री 9 वाजता सुरू झालेलं ऑपरेशन ऑल आऊट शुक्रवारी रात्री 1 वाजता संपलं आहे. दरम्यानच्या चार तासांत ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाचा परिसर पिंजून काढला आहे. परिसरातील अनेक आरोपींसह इतरही गोष्टींची देखील झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, गर्दुल्यांचा वावर असलेली ठिकाणं, गुन्हेगारी वस्त्या आणि संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली आहे. यावेळी पोलिसांनी तडीपार, फरारी आणि सराईत आरोपींची झाडाझडती घेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.