मुंबई :-
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्र सोडल आहे. मेट्रोचा प्रकल्प एव्हाना पूर्ण झाला असता पण केवळ अहंकारापोटीच ठाकरे सरकारने कारशेड कांजूरमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली
मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात असलेल्या कायदेशीर वादाचा मुद्दा उपस्थित करत जमीन हस्तांतरणाचा आदेशच रद्द करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्याबाबत प्रविण दरेकर यांना विचारण्यात आले असता त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मेट्रो प्रकल्प कधीच पूर्ण झाला असता, पण अहंकारापोटी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला. जागेचं हस्तांतरण व्यवस्थित झालं नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यानेही सांगितलं आहे. त्यामुळे कारशेडला अजून वेळ लागणार असून परिणामी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्नही अजून लांबणार असल्याचा दावा दरेकर यांनी केला. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला कोर्टाने फटकारले असल्याचंही ते म्हणाले.
आरेतून हा प्रकल्प स्थलांतरीत केला तर जागेचा प्रश्न निर्माण होईल. हा प्रकल्प रेंगाळेल आणि त्याचा भुर्दंड सरकारला सोसावा लागेल. शिवाय त्याची झळ थेट मुंबईकरांनाही बसेल. प्रकल्प रेंगाळला तर मुंबईकरांच्या तिकिटात वाढ होऊन मुंबईकरांच्या खिशाला झळ बसेल. पण या गोष्टींचा सरकारने सारासार विचार केला नाही. अहंकाराने भरलेलं हे सरकार आहे. हम करे सो कायदा या उक्तीप्रमाणे हे सरकार वागत आहे. त्यामुळेच कोर्टाने या सरकारला फटकारले आहे, असं दरेकर म्हणाले. कारशेडच्या स्थलांतराची प्रक्रिया सदोष असल्याचंही कोर्टाने नमूद करून सरकारला चपराक लगावल्याचंही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं.