नाशिक
नाशिक शहरातील महिला सध्या दहशतीखाली वावरत आहेत. लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहेत. नाशिक शहरात लॉन्स परिसरात महिलांना चोरटयांकडून टार्गेट केलं जात आहे. महिनाभरात तब्बल 33 तोळे सोनं लंपास करण्यात सोनसाखळी चोर यशस्वी झाले आहेत. विविध ठिकाणी सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना सीसीटीव्हीत चित्रीतही झाल्या. मात्र पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यावरुन जात असताना चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले होते. पोलिसांना लगेच तक्रार दिली होती. सीसीटीव्ही देखील मिळालं होतं. आरोपीदेखील पकडले गेले होते. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप, मंगळसूत्र चोरीला गेलेल्या महिलेकडून करण्यात आला आहे. सिक्युरिटी गार्डचा अभाव चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचा दावा पोलिस अधिकार्यांकडून केला जातोय. तसंच परिसरातील पार्किंगमुळे देखील हे प्रमाण वाढल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी, सोनसाखळी चोरांच्यादृष्टीने शहरांमध्ये ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. त्यासाठी काही वर्दळीच्या ठिकाणचे स्पॉट निश्चित करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सिक्युरिटी गार्ड वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्यासाठी सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आता या सगळ्या घटनांचे खापर नाशिक पोलिसांनी लॉन्स मालकांच्या डोक्यावर फोडलं असलं, तरी आता वास्तवात पोलिसांकडून याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.