📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
बोळींजमधील 5 मजली बेकायदा इमारतीवर पालिकेची कागदी कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
अगोदरच 55 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणामुळे पुरत्या बदनाम झालेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या भ्रष्ट कारभार अद्यापही सुधारलेला दिसत नाही. विरार पश्चिम येथील बोळींज गावातील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या पाच मजली इमारतींबाबत पुराव्यासह अनेक लेखी तक्रारी करण्यात आल्यानंतर तोडक कारवाईची नोटीस बजावल्यानंतरही गेले 6 महिने पालिकेकडून अद्यापपर्यंत काहीच कारवाई अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अनधिकृत इमारतीला पालिकेच्या प्रभाग ‘अ’ बोळींज विभागाच्या अधिकार्यांचे अभय असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसई-विरार शहर महानगरपालिकेचा ‘अ’ प्रभाग अंतर्गत बोळींज गाव येथे माधव अपार्टमेंट को.ऑप.हौ.सो. या इमारती शेजारी एक अनधिकृत पाच मजल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ 20 हजार चौरस फूट असून या इमारतीत 35 सदनिका आहेत. या इमारतीचे बाजारमूल्य अंदाजे 8 कोटी रुपये आहे. ही इमारत प्रतीक भरत कोठारी याने बांधली आहे.
विशेष बाब म्हणजे ही इमारत उभारण्यात आलेली 4 गुंठे जागा ही पालिकेच्या उद्यानासाठी राखीव होती. ही अनधिकृत इमारत बांधण्यासाठी सिडको, वसई-विरार शहर महानगरपालिका तसेच महरेरा यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.कहर म्हणजे या इमारतीतील पालिकेतर्फे पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनेक तक्रारी पालिकेला मिळाल्यानंतर पालिकेतर्फे 1 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 व कलम 52,53 व 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला 6 महिने उलटून गेल्यानंतरही पालिकेने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. या अनधिकृत इमारतीचा पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा नियमित सुरू आहे. त्याचप्रमाणे या इमारतीच्या मालकावर अद्याप कोणताही फौजदार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पालिकेच्या ‘अ’ प्रभागाच्या कार्यालयापासून अवघ्या 300 ते 500 मीटर अंतरावरील या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पालिकेच्या ‘अ’ प्रभागातील अधिकार्यांना दिसले कसे नाही? याबाबत लेखी तक्रारी होऊनही पालिका अधिकारी कारवाई का करत नाहीत? या अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावून 6 महिने उलटले तरी हे बांधकाम करणार्या प्रतीक कोठारी याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पालिका अधिकार्यांना वेळ का लागत आहे? पालिकेच्या ‘अ’ प्रभागातील सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंत्यांचे प्रतिक कोठारीशी आर्थिक हितसंबंध आहेत काय? असे प्रश्न येथील नागरिकांकडून विचारले जात आहे.