मुंबई
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामासाठी २ जानेवारीच्या पहाटेपासून ३ जानेवारीच्या पहाटेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. आता हे काम पूर्ण झालं आहे. मात्र तरीही गाड्यांच्या वेगावर काही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस ह्या गाड्या १५-२० मिनिटे उशिरा धावतील.
मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुतार म्हणतात,”ठाणे दिवा स्लो लाइनवरच्या २४ तासांच्या मेगाब्लॉकनंतर, सुरक्षेसाठी पुढील तीन चार दिवस गाड्यांच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा धावणार आहे. शक्य तितक्या लवकर हे निर्बंध दूर केले जातील”.