मुंबई :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला मात्र मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूकीसाठी रेल्वे बंद असल्याने बेस्टचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आता सामान्य प्रवाशांना वाहतूक सुविधा पुरविणाऱ्या बेस्ट प्रशासनालाच कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. कोरोनामुळं आतापर्यंत बेस्टमधील ५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्टमध्ये कोरोनापासून बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत आहे.
कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जरी चांगलं असलं तरी मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होत आहे. साधारण जूनच्या पहिल्याच आठवड्यात १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आता वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ५०५ कोरोनाबाधित कर्मचारी बरे झाले आहेत, तर गेल्या एक आठवड्यापासून प्रतिदिन कोरोनाबाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली असून ही संख्या ३०० वरून ९० वर आली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई महानगरात गेल्या ७ महिन्यांपासून बेस्ट उपक्रम आपली परिवहन सेवा देत आहे. परिवहनबरोबरच विद्युत विभाग, अभियंता, सुरक्षारक्षक व अन्य विभागांतील कर्मचारीही कार्यरत आहेत. परिवहन आणि विद्युत विभागातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, तर सुरुवातीच्या काळात काही कर्मचारी कर्तव्यावर नसतानाही करोनाबाधित झाले.