मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र दुसरीकडे पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होत नसून अनेक भागात नागरिक मुखपट्टीविनाच फिरत आहेत. पालिकेच्या पथकांनी मंगळवारी मुखपट्टीविना फिरणाऱ्या पाच हजार, तर पोलिसांनी दोन हजार नागरिकांवर कारवाई केली. रेल्वे मात्र या कारवाईबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या आठवडय़ापासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत तैनात करण्यात आलेली पथके सज्ज झाली आहेत. असे असले तरीही कारवाईची तीव्रता अद्याप वाढलेली नाही. मुंबईतील अनेक भागात मुखपट्टीविना नागरिक फिरताना दिसत आहेत. तसेच काही भागात मुखपट्टीविना फिरणारे नागरिक पालिकेच्या पथकांतील कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिक आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांत संघर्षांची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. पालिकेच्या पथकांनी मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी ठिकठिकाणी मुखपट्टीविना फिरणाऱ्या ५,००७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून १० लाख एक हजार ४०० रुपये वसूल केले.
दक्षिण मुंबईतील कुलाब्यापासून भायखळय़ापर्यंतच्या परिसरात (परिमंडळ १) मुखपट्टीविना फिरणाऱ्या सुमारे १,३७३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल दादर, माहीम, धारावी, परळ, माटुंगा, वडाळा आणि आसपासच्या परिसरातील (परिमंडळ २) ८३१, दहिसर, बोरिवली आणि आसपासच्या परिसरातील (परिमंडळ ७) ६७२, पश्चिम उपनगरातील अंधेरी, मालाड आणि आसपासच्या परिसरातील (परिमंडळ ४) ६४८, वांद्रे, खार आणि आसपासच्या भागातील (परिमंडळ ३) ५७५, तर कुर्ला, मानखुर्द, गोवंडी आदी भागातील (परिमंडळ ५) ५४० नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. तर मुलुंड, घाटकोपर, भांडूप आदी भागात (परिमंडळ ६) केवळ ३८६ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे.