कळवा
कळवा–मुंब्रा–दिवा भागात ४० वर्ष जुनी झालेली पाण्याची मुख्य पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. वारंवार जुनी पाईपलाईन फुटणे तसेच नव्या पाईपलाईनच्या कामासाठी शटडाऊन घेत असल्याने दिवा, मुंब्रा आणि दिवा शहरांमध्ये पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण होत आहे. हे टाळण्यासाठी ही नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२२ ची मुदत आहे. याचे काम मुदतीत कशा प्रकारे होईल आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करुन हे उद्दिष्ट एक ते दोन महिने आधी म्हणजेच मार्च २०२२ पर्यंत कसे पूर्ण होईल करण्यासंदर्भात यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत सयुंक्त बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत कळवा भागातील पारसिक नगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याकरिता महापालिकेकडे निधीची कमतरता भासत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यास नगरविकास विभागाकडून तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता कळवा, पारसिकनगर येथे ८१ मिमी. मृदुपोलादी ७०५ मी. व्यास व लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी २ कोटी ४३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.