‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेला आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखला जाणारा मराठी मनोरंजन विश्वातील मराठमोळा अभिनेता म्हणजे, गौरव मोरे. त्याच्या आगळ्या वेगळ्या, पण क्लासी कॉमेडी स्टाईलनं त्यानं सर्वांना आपलंस केलं. त्याची हटके शैली आणि दमदार अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आता गौरव मोरे ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात दिसतोय आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाला खळखळून हसवतोय. पण, गौरवला खरी ओळख मिळाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे. पण, तरीसुद्धा 2024 मध्ये अभिनेत्यानं अचानक एग्झिट घेतली.
गौरवनं अचानक घेतलेल्या एग्झिटनंतर प्रेक्षकांचा मोठा हिरमोड झालेला. पण, आता ‘चला हवा येऊ द्या’मधून गौरवनं कमबॅक केल्यामुळे चाहत्यांची कळी पुन्हा खुलल्याचं पाहायला मिळतंय. पण, ज्यावेळी गौरवला विचारलं की, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परत जाणार का? यावर मात्र त्यानं भुवया उंचावणारं उत्तर दिलं आहे.
गौरव मोरेनं ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वातून कमबॅक केलं आहे. अशातच त्यानं नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यानं भविष्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याची संधी मिळाली तर, तू परत जाणार का? असं विचारलं गेलं. पण, त्यावर गौरवनं एकाच शब्दात स्पष्ट उत्तर दिलं. गौरव म्हणाला, “नाही… आता कठीण आहे जरा. कारण आता मी चला हवा येऊ द्यामध्ये काम करतोय ना, त्याच्यामुळे…”
गौरव मोरे हास्यजत्रेत पुन्हा परण्याविषयी म्हणाला, “आता कठीण आहे जरा कारण, आता मी इथे (चला हवा येऊ द्या) काम करतोय त्यामुळे कठीण आहे. माझी ओळख, माझं नाव सगळं हास्यजत्रेमुळे झालं. हास्यजत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही. ते कायम माझ्याबरोबर राहणार… पण, काय असतं आपलं काम आहे… थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातोच म्हणून मी इकडे आलो. आता मला पाहिल्यावर फिल्टरपाड्याचा बच्चन असं म्हणतात ही ओळख सुद्धा कधीच पुसली जाणार नाही.”
मुलाखतीत पुढे गौरवला भविष्यात जर सिनेमा आला, तर त्याच्या प्रमोशनसाठी तरी हास्यजत्रेत जाशील का? असं विचारलं गेलं. असं विचारल्यावर मात्र गौरव मोरेनं काही सेकंदांसाठी ब्रेक घेतला. गौरव मोरे खळखळून हसला आणि म्हणाला की, “पण आता आपल्याकडे आहे चला हवा येऊ द्या, माझं आहे ना आता तिथे..”







