मुंबई : मागील अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मुंबई सेंट्रलवरूनआता वाहतूक पूर्ववत होण्याचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आजपासून येथून एसटी गाड्या पुन्हा धावणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटी गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकातून धावत आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून हा खर्च होत आहे. मुंबई सेंट्रल स्थानक आगारातील काँक्रीटीकरणाचे काम २३ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाले होते. ते १३ मार्च रोजी पूर्ण झाले. काँक्रीटीकरणामुळे मुंबई सेंट्रल येथे पूर्ण होणाऱ्या फेऱ्या अन्य स्थानकांत वळवण्यात आल्या होत्या. या फेऱ्या पूर्ववत करून मुंबई सेंट्रलपर्यंत चालवाव्यात आणि येथूनच गाड्या सोडाव्यात, अशा सूचना महामंडळाच्या मुंबई विभागाचे विभाग नियंत्रक यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
‘एमआयडीसी’च्या निधीतून एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानक परिसरांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल आगारातील परिसराच्या एक हजार ९०० चौरस मीटर जागेचे काँक्रीटीकरण करण्यासाठी एक कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. आगार आणि बस स्थानक परिसरात क्राँकीटीकरणाचे काम सुरू असल्याने सेंट्रल येथून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला नेहरूनगर स्थानकात जावे लागत होते. हा प्रवास त्रासदायक ठरत असल्याची अनेक प्रवाशांची तक्रार होती. आता मात्र प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.






