📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
मुंबईला पुरविल्या जाणाऱ्या ३४% पाण्याची गळती किंवा चोरी
95 किलोमीटरचे भूमिगत बोगदे बांधण्याची पालिकेची योजना
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईला पुरविल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी सुमारे 34 टक्के पाण्याची गळती किंवा चोरी होते, किंवा सदोष पाणीमापकांमुळे त्याचा हिशोब लागत नाही. मुंबईत हे प्रमाण (एनआरडब्लू) तीन वर्षांपूर्वी 38 टक्के होते. ते आणखी कमी करण्यासाठी सुमारे 95 किलोमीटरचे बोगदे बांधण्याची पालिकेची योजना आहे.
मुंबई महापालिका हद्दीत सध्या सात जलाशयांतून दररोज 3950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी दररोज सुमारे 1343 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी तसेच गळती होते किंवा योग्य मोजणी होत नाही. या पाण्याचा कोणताही महसूल पालिकेला मिळत नाही. ज्या पाण्याचा महसूल मिळत नाही असे पाणी (नॉन रेव्हेन्यूबल वॉटर) ही पाणीपुरवठ्यातील एक प्रमुख समस्या आहे. देशपातळीवर शहरी भागांत त्याचे प्रमाण सुमारे 32 टक्के ते 40 टक्के इतके आहे. मुंबईत तीन वर्षांपूर्वी अशा गळती- चोरीचे किंवा सदोष जलमोजणीचे (मीटरिंग) एकूण प्रमाण हे 38 टक्के होते. पण त्यात आता चार टक्के घट झाली आहे. प्रामुख्याने ज्या भागात बोगद्यांमधून पाणी वाहून नेले जाते, त्या भागात पाणीचोरी किंवा गळतीचे प्रमाण हे नगण्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गळती किंवा चोरी रोखण्याचा रामबाण उपाय म्हणून बोगद्यांकडे पाहिले जात आहे.
पाणीपुरवठा खात्याचे मुख्य अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, जलस्रोतांचे पाणी शुद्धीकरणासाठी पांजरापूर, भांडुप संकुल, विहार तसेच तुळशी येथे आणले जाते. प्राथमिक स्तरावरील व्यवस्थेत 43 किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे.
पालिकेचा पाणी विभागात सध्या 712 अभियंते, 652 प्रशासकीय अधिकारी आणि 5149 कर्मचारी आहेत. विविध श्रेणीतील अभियंत्यांची सुमारे 40 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे.
=====
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदारः शेलार
भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, नवीन पाण्याची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. शेलार म्हणाले की, 90 च्या दशकामध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्या बाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने गठीत केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला.
“आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळखंडोबा याचे दुष्परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. आज हे जे मुंबईत दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे त्याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आहेत. मुंबई 34% पाणी गळती आहे असे महापालिका सांगते आहे. त्यासाठी कोट्यावधीची कंत्राटे दिली, पण त्याचे पुढे झाले काय? हे कळायला मार्ग नाही“ असे गंभीर आरोप त्यांनी केला.
