📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ मताधिक्याचा मान ईशान्य मुंबईची शान
——–
अभिजीत राणे
समुह संपादक, दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र
उत्तर मुंबईप्रमाणेच भौगोलिकदृष्टय़ा बऱ्यापैकी मोठा असलेला हा मतदार संघ आणि या मतदार संघाचे सामाजिक स्वरूपही खूपच मिश्र स्वरूपाचे असल्याने तिथून निवडून येणे निश्चितच आव्हानात्मक मानले जाते. परंतु आपल्या कामाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने ईशान्य मुंबई आपला बालेकिल्ला केल्यासारखी स्थिती आहे. जयवंतीबेन मेहता, किरीट सोमय्या, प्रमोद महाजन, मनोज कोटक हे या मतदार संघातून विजयी झालेले उमेदवार आहेत. मतदारांशी नित्य संपर्क आणि विकासकामांच्या मुद्दावर हा मतदार संघ आपल्या बाजूला ठेवण्यात भाजपाला यश आलेले आहे.
यातला महत्त्वाचा भाग असा आहे की इथली सामाजिक परिस्थिती बरीच मिश्र स्वरूपाची आहे. घाटकोपर, मुलुंड या भागात गुजराती वस्ती जरी जास्त असली तरी चेंबूर परिसरात दक्षिण भारतीय, गोवंडी परिसरात मुस्लिम मतदारांची मोठी संख्या तर विक्रोळी भांडुप, कांजूर आणि मुलुंडचा पूर्व भाग या ठिकाणी मराठी टक्का मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांना बरोबर घेऊन म्हणजेच ‘सबका साथ सबका विश्वास’ हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून भाजपाने आपली विजयाची रणनीती कायम ठेवली. यावेळच्या निवडणूकीसाठी मुलुंडमधूनच आमदार म्हणून निवडून आलेल्या मिहीर कोटेचांना उमेदवारी दिली गेली. तर महाविकास आघाडीने संजय दिना पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. महायुतीचे तीन आमदार, महाविकास आघाडीचे दोन आमदार तर अबू आझमी यांचा मतदार संघ अशी विभागणी लक्षात घेतली तर महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसते. गेल्या काही वर्षात या भागातल्या काही महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. राज्यात महायुतीच्यावतीने या भागातील समस्या सोडवून घेण्यात मिहीर कोटेचांनी बऱ्यापैकी पुढाकार दाखवलेला आहे. उत्तम मराठी बोलणारे आणि सतत लोकांसाठी उपलब्ध असणारे मिहीर कोटेचा आपल्या विजयाबाबतीत निर्धास्त आहेतच परंतु गेल्या निवडणूकीत मनोज कोटक यांना पाच लाखांवर मतं पडली यावेळी ते प्रमाण वाढावे आणि भाजपाच्या मतदानात ईशान्य मुंबईची शान राहावी असा आपला प्रयत्न असल्याचे मिहीर कोटेचांचा प्रयत्न आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघात तीन चार ठिकाणी सभा घेतल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकसित आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठीचे आपण एक निमित्त आहोत. आणि आपल्याला मिळणारे मत हे भारताच्या भवितव्याला दिले जाणारे मत असेल. म्हणजेच मोदींना होणारे हे मतदान विक्रमी मताधिक्याचे असावे. असा आपला प्रयत्न आहे त्यातच माझ्या मतदार संघाची ईशान्य मुंबईची शान राहील असा उल्लेख मोठ्या अभिमानाने मिहीर कोटेचा करीत आहेत. आपल्याला म्हणजेच मोदींना होणाऱ्या मतदानातून व्यक्तिशः मी जरी निवडून येणार असलो तरी तो या देशाचा आणि मतदारांचादेखील विजय ठरतो. संपूर्ण देशात चारसो पार पूर्ण करण्यासाठी मतदारांनीच आता संकल्प केलेला आहे त्या चारसोपारमध्ये ईशान्य मुंबईचे स्थान अधिक महत्वपूर्ण ठरावे अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण अधिक प्रयत्न करीत आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी एकांगी आणि एकत्रित प्रचार सुरू केल्याचे दिसते. त्यांच्या वडिलांनीदेखील भांडुप मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यांचा काही ठराविक मतदार वर्ग आहे परंतु सध्यांचे देशभरातले वातावरण लक्षात घेतले तर मोदींचे मतदार हेच ईशान्य मुंबईचे खरे वारसदार ठरणार आहेत.
रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट या सर्वांच्या एकत्रित शक्तीतून ईशान्य मुंबईत यावेळेला निश्चितपणे विक्रमी मताधिक्य सिद्ध होऊ शकते. मतदार संघाचा विचार करताना मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित निवास अशा दोन्ही गोष्टींना आपण प्राधान्य देत आहोत. सामान्य मतदारांपर्यंत मोदींनी जाहीर केलेल्या योजना पोहचवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि यावेळची ईशान्य मुंबईची निवडणूक चुरशीची म्हणण्यापेक्षा नवी दिशा निश्चित करणारी निवडणूक असेल यात काही शंका नाही.