📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ विकासक मस्त… लोकप्रतिनिधी सुस्त… रहिवासी त्रस्त…!
◆ मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छता मोहिमेची विक्रोळीत तीन-तेरा!
———
◆ टागोरमधील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
◆ वृद्ध आणि लहान मुलांमध्ये बळावले श्वसनाचे आजार
◆ पालिकेचा ‘एस’ वार्ड झोपेत; टागोरनगरकरांची संतप्त प्रतिक्रीया
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
विक्रोळीतील टागोरनगर व परिसरात सध्या मोठ्याप्रमाणात म्हाडाच्या इमारतींची पुर्नबांधणीची बांधकाम तसेच काही ठिकाणी गटार रुंदीकरणाची कामे चालू आहेत. मात्र, यामुळे टागोर नगर येथील ग्रुप 1 ते 8 येथील रस्त्यांवर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे यापरिसरात वृद्ध आणि लहान मुलांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे विकासकांकडून येथे होत असलेल्या बांधकामांमुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मागील सहा महिन्यांपासून टागोर नगर येथील बिल्डिंग क्रमांक 409 ते 415 पर्यंत गटार रुंदीकरणाची काम पुर्ण होऊनही, कंत्राटदाराकडून आजपर्यंत बांधकामची सर्व माती व राडारोडा तसाच रस्त्यावर टाकण्यात आला आहे त्यामुळे अनेक वयोवृध्द पादचाऱ्यांचा तसेच दुचाकी चालकांचा येथे अपघात होतो. पालिकेच्या
‘एस’ वार्ड ला मात्र याचे काडी मात्र ‘सोयर सुतक’ नाही. देशाचे पंतप्रधान यांच्या मागदर्शनाखाली संपुर्ण राज्यात करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च केले जात असताना मात्र, ‘एस’ वार्ड याला अपवाद असून, त्यांना स्वच्छतेशी काही देणं-घेणं नसल्याचे स्थानाकांकडून बोलले जात आहे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार याबाबत कानाडोळा करत असून यामुळे रहिवाशांना याचा त्रास भोगावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरीकांनी कंत्राटदाराला विचारणा केली असता, “ही ‘एस’ वॉर्डच्या मेन्टनन्स विभागाची जबाबदारी असून त्यांनी या संदर्भात कारवाई करून परिसर स्वच्छ करावा. आमचा याच्याशी काही संबंध नाही.” असे उर्मट उत्तर कंत्राटदाराकडून दिले जाते असे स्थानिक नागरीकांनी सांगितले.
तसेच विकासकांकडून सुरु असललेल्या इमारतींच्या कामा बाबतीत कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसून,रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभे करणे, कामे चालू असताना जी माती पडते ती साफ न करणे, असाप्रकार सर्रास केला जातो. आता यावर पालिकेचा ‘एस’ वार्ड याबाबतीत काय कारवाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
