📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ मनसे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत?
◆ उत्तर भारतीयांची मते दुरावण्याची भाजपला भिती
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर देश पातळीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन परतलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अद्यापही गूढ कायम आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकतर महायुती आणि मनसेमध्ये लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्व लढत होईल,किंवा लोकसभेत एकही जागा न लढवता मनसे महायुतीचा प्रचार करेल आणि आगामी विधानसभा महापालिका निवडणुकांमध्ये मनसे बऱ्यापैकी जागा लढवेल अशी दाट शक्यता आहे.
अमित शाह यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. 400 पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला मुंबईतील मनसेची 5 लाख मते स्वतःकडे वळवण्यासाठी तसेच उद्धव ठाकरे व इतर आघाडीतील नेत्यांचा समाचार घेण्यासाठी राजे ठाकरे यांची वक्तृत्वाची तोफ उपयोगी पडेल, असा विचार भाजपच्या एका गोटात सुरु होता. त्यामुळे मनसेच्या पदरात दक्षिण मुंबई आणि शिर्डीचीं जागा पडेल. अशी शक्यता वर्तवली जात होती.
गेल्या गुरुवारी मुंबईतील ‘ताज लँड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तासांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी महायुतीमधील घटक उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थितीत होते. त्याचवेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या बैठकीत विशेष काही निष्पन्न झाले नाही. आता येत्या 9 मार्च रोजी गुढीपाडव्या निमित्त होणाऱ्या मनसे मेळाव्यात राजे ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर महायुतीमध्ये मनसेला सामील केले जाईल, असे कळते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध राजे ठाकरे असे ट्रम्पकार्ड भाजपला वापरायचे आहे. भाजपातील एक गट मनसेला दक्षिण मुंबईची जागा द्यावी, या विचाराचा होता. परंतु बऱ्याच विचार मंथनानंतर याचा कोणताच फायदा होणार नाही, या निष्कर्षावर भाजप पोहचली. कारण दक्षिण मुंबईत व्यापारी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि या वर्गात मनसेची छाप चांगली नाही. उलट मनसेला जागा दिल्याने येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विजयचा मोकळा होईल, असा तर्क महायुतीने मांडला आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीमध्ये सामील न करण्याचे आणखी कारण आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रतिमा उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजप नेते महायुतीमध्ये आणखी कारण आहे. मनसे प्रमुख राजे ठाकरे यांची प्रतिमा उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजप नेते महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाबद्दल फुंकून ताक पिताना दिसत आहेत.एकीकडे राज्यात हिंदु मतांची विभागणी होऊ नये, म्हणून मनसेचा महायुतीत समावेश करावा असेही भाजपला वाटते आहे. तर दुसरीकडे मनसेच्या समावेशमुळे मुंबई बरोबरच उत्तर प्रदेश, बिहार येथील उत्तर भारतीयांची मते दुरावण्याची शक्यताही भाजपला वाटत आहे. त्यामुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करायला तयार होईल असे वाटत नाही. त्यामुळे सध्या तरी मनसे महायुतीमध्ये सामील न होता महायुती-मनसेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर मनसे जर स्वतंत्र लढली तर शिवसेनेच्या (उबाठा) मराठी मतांवर परिणाम होईल अशी महायुतीची धारणा आहे.