सिंधुदुर्ग
‘ज्या दिवशी शिवसेना नारायण राणे साहेबांची बदनामी करणे थांबवेल. त्यांना त्रास देणं थांबवेल, त्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल,’ असं माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे. ‘नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे बंधूंमधील कथित मतभेदांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी शिवसेनेशी सलगी करण्याचे संकेत दिल्यामुळं त्यांचे थोरले बंधू निलेश राणे भलतेच नाराज झाले होते. जाहीर ट्विट करून त्यांनी नितेश यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यामुळं दोन्ही भावांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. तशा बातम्याही सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.
नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.
निलेश राणे यांनी आज नवे ट्विट करून या वादावर खुलासा केला आहे. ‘मीडियाने माझ्या ट्विटचा गैरअर्थ काढला आहे. नीतेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. माझ्या अधिकारातून मी नितेशला समाजावले. शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर शिवसेनेनं राणे साहेबांची बदनामी आणि त्यांना त्रास देणे थांबवले तर त्यांचा आणि माझा विषय संपेल,’ असे नीलेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळं दोन्ही भावांमधील मतभेदांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.
सेनेशी जुळवून घ्यायला तयार ः नारायण राणे
महाराष्ट्रातल्या राजकारणातले आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेसोबतचे सगळे जुने वैर विसरून मी जुळवून घ्यायला तयार आहे. मात्र हे एकतर्फी असू नये तर त्यासाठी शिवसेनेनही पुढाकार घ्यावा असे मतही नारायण राणे यांनी व्यक्त केले. शिवसेनेने राजकीय हल्ले सुरूच ठेवले तर शिंगावर घ्यायलाही कमी करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकासासाठी शिवसेनेसोबत सहकार्यास तयार आहे असंही त्यांनी सांगितले. पुढं जायचे असेल तर जुनं वैर विसरून जायला पाहिजे, किती दिवस त्याच गोष्टींवर आपण अडून बसणार आहोत असा सल्ला आपण नारायण राणे यांना दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.